राहुरी :- राहुरी येथील वकिल दांम्पत्याचा खंडणीसाठी अपहरण करुन खुन करणारा सराईत आरोपी व त्याचे ०३ साथीदार २४ तासाच्या आत जेरबंद केली असून स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी राजाराम जयवंत आढाव वय ५२ वर्षे व मनिषा राजाराम आढाव वय ४२ वर्षे(दोन्ही रा. मानोरी, ता. राहुरी, जि. अहमदनगर ) हे वकिल दांम्पत्य त्यांचे राहत्याघरुन राहुरी कोर्टामध्ये गेले होते.
परंतु दुपारनंतर त्यांचे नातेवाईकांनी त्यांचेशी संपर्क केला असता त्यांचा कोणाशीही संपर्क झाला नसल्या कारणाने लता राजेश शिंदे वय ३८ वर्षे, रा. बाजारपेठ, पानसरे गल्ली, संगमनेर यांनी दिलेल्या खबरीवरुन राहुरी पोलीस स्टेशन मिसींग बाबत तक्रार दाखल करण्यात आली होती.
राहुरी परिसरामधुन वकिल दांम्पत्य मिसींग झाल्याची घटना घडल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन एलसीबी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना आढाव वकिल दांम्पत्याचा शोध घेणेबाबत सुचना दिल्या. आहेर व स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि तुषार धाकराव तसेच पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, रविंद्र कर्डिले, गणेश भिंगारदे, अमृत आढाव, सागर ससाणे, संदीप पवार, दत्तात्रय गव्हाणे, सचिन अडबल, भिमराज खसे, प्रमोद जाधव, रणजित जाधव, संतोष खैरे, फुरकान शेख, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, भाऊसाहेब काळे, संभाजी कोतकर, चंद्रकांत कुसळकर, अर्जुन बडे, यांचे तीन वेगवेगळे पथक तयार करुन पथकास सुचना देवुन वकिल दांम्पत्याचा शोध घेणेकामी रवाना केले.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस पथक हे मानोरी ते राहुरी जाणारे रोडवरील तसेच राहुरीकोर्ट परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज, तांत्रिक विश्लेषणाचे आधारे व वकिल दांम्पत्याकडे कोणकोणत्या आरोपींचे वकिलपत्र आहेत याबाबत माहिती घेत असतांना राहुरी कोर्ट परिसरामध्ये तसेच मानोरी परिसरामध्ये एक संशयीत कार दिवसा व रात्रीचे वेळी गेलेली असल्याचे दिसुन आले. सदर कारचा शोध घेत असतांना रेकॉर्डवरील आरोपी किरण दुशींग रा. राहुरी याचे वॉरंटबाबतचे प्रकरण आढाव वकिल दांम्पत्याकडे असल्याचे व सी.सी.टी.व्ही. फुटेजमध्ये दिसुन आलेली संशयीत कार किरण दुशींग वापरत असल्याची माहिती मिळाली.
पोलीस पथकास किरण दुशींग याची मागील गुन्हेगारी पार्श्वभुमी माहित असल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे पूर्ण नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव १) किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग वय ३२ वर्षे, रा. उंबरे, ता. राहुरी, जि. अहमदनगर असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे सखोल व बारकाईने तपास करता त्याने मागील काही दिवसापासुन त्याचे साथीदार २) भैया उर्फ सागर साहेबराव खांदे रा. येवले आखाडा, ता. राहुरी, जि. अहमदनगर, ३) शुभम संजीत महाडिक रा. गणपतवाडी शाळेजवळ, मानोरी, ४) हर्षल दत्तात्रय ढोकणे रा. उंबरे, ता. राहुरी, जि. अहमदनगर, ५) बबन सुनिल मोरे रा. उंबरे, ता. राहुरी, जि. अहमदनगर यांचेसह कट करुन वकिल कोर्ट केसच्या कामकाजाकरीता बोलावुन घेतले. त्यानंतर त्यांना किरण दुशींग याने स्वतःचे गाडीत बसवुन वकिल दांम्पत्यांचे घरी घेवुन जावुन त्यांचे घरामध्ये दोघांचे हात पाय बांधुन ठेवुन ५ लाख रुपये खंडणीची मागणी केली. परंतु वकिल दांम्पत्याने त्यांना पैसे देण्यास नकार दिल्याने त्याच घरामध्ये ५ ते ६ तास त्यांचा छळ केला. त्यानंतर त्यांना वकिल दांम्पत्याचे गाडीमध्ये बसवुन त्यांना मानोरी गावाचे बाहेर घेवुन जावुन रात्रीचे सुमारास दोघांचे डोक्यामध्ये प्लॅस्टीक पिशव्या घालुन त्यांचा श्वास गुदमरुन खुन केलेबाबत व त्यांचे मृतदेह उंबरे गावातील स्मशानभुमीचे जवळ असलेल्या विहीरीमध्ये दगड बांधुन टाकुन दिले व त्यानंतर वकिल दांम्पत्याची गाडी राहुरी कोर्ट परिसरामध्ये लावली असल्याचे सांगितले.